बहादुरगड (Bahadurgad)

बहादुरगड (bahadurgad) हे या किल्ल्याचे प्रचलित नाव असले तरी ते अधिकृत नव्हते. किल्ल्याचे कागदोपत्री नाव पेडगावचा भुईकोट किल्ला आहे. गॅझेट मध्येही अशीच नोंद आहे. २५ मे २००८ ला या गडाचे धर्मवीरगड असे नामांतर केले आहे. हा भूईकोट किल्ला अहमदनगर जिल्ह्यात असून दौंड जवळ आहे.

उंची : १७१० फूट ⛰️

इतिहास 🚩

● पेडगावचा भूईकोट किल्ला (bahadurgad) देवगिरीच्या यादवांच्या काळात अस्तित्वात होता.
● यादवांकडून हा किल्ला निजामशाहीत गेला.
● निजामशाहीनंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात आला.
● मोगलांचा सरदार बहादूरशहा कोकलताश हा किल्ल्यावर तळ ठोकून होता. हा बहादुरशहा औरंगजेबाचा दूध भाऊ होता.
● बहादुरशहाने किल्ल्याची डागडुजी करून किल्ल्याला बहादूरगड नाव दिले असे म्हटले जाते.
● छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरून काढायला बहादुरखानाने आपण होऊन शिवाजीराजांना संधी दिली. बहादुरखानाने एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरबी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते. महाराजांच्या हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला होता. महाराजांनी आपल्या एका सरदाराबरोबर नऊ हजारांचे सैन्य बहादुरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले. या सैन्यप्रमुखाने आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने गडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादुरखान लढाईसाठी तयारी करून मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. त्यावेळी मराठ्यांच्या तुकडीने माघार घेऊन पळायला सुरुवात केली. त्यामुळे बहादुरखानाला चेव चढला. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी बहादुरखानाला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादुरगडावर हल्ला चढवला. गडामधे तुरळक सैन्य, नोकरचाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठ्यांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कूच केले. बहादुरखान पाठलागावरून परत आला, तेव्हा त्याला मराठ्यांनी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली. तेव्हा त्याला मराठ्यांच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी आपली इभ्रत वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले होते.
● छत्रपते संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मोगल सैन्याने संगमेशवर जवळ कैद केले. दिनांक १५ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी त्या दोघांना बहादूरगडावर आणण्यात आले. तिथे त्यांची उंटावरुन धिंड काढण्यात आली.
● इसवीसन १७५१ मध्ये सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला.
● यानंतर इंग्रजांनी मराठ्यांकडून हा किल्ला जिंकून घेतला.

स्थळदर्शन 😍

◆ या गडावर खुपसाऱ्या प्रमाणात मंदिरे, देवांच्या मूर्ती आणि वीरगळी आहेत.
◆ पेडगावाच्या वस्तीतून थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत आपण खाजगी वहानाने जाऊ शकतो.
◆ प्रवेशव्दाराच्या अगोदर डाव्या बाजूला हनुमानाची ४ फ़ुटी मुर्ती एका देवळीत ठेवलेली आहे.
◆ किल्ल्याचे गावाकडील प्रवेशव्दार उत्तराभिमुख आहे. भव्य प्रवेशव्दाराची कमान शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूचे बुरुज मात्र ढासळलेले आहेत.
◆ किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भैरवनाथाचे मंदिर आहे. हे मंदिर यादवकालिन असून दगडात बांधलेले आहे.
◆ मंदिरा समोरील दिपमाळे खाली अनेक जुन्या मुर्ती ठेवलेल्या आहेत.
◆ त्यात उमा महेश्वर, विष्णू, सर्पशिळा सतीचा हात, समाधीचे दगड, कोरीव दगड, दोन स्त्रीयांचे मुख कोरलेले एक दगड इत्यादी पाहायला मिळतात.
◆ दिपमाळे समोरील पायऱ्या उतरुन खाली उतरल्यावर गजलक्ष्मीची ३ फ़ुटी मुर्ती आहे.
◆ पायवाटेने थोडे पुढे जाऊन उजवीकडे वळल्यावर मल्लिकार्जुन मंदिर आहे.
◆ मंदिराच्या पुढे दारु कोठाराची भग्न इमारत आहे.
◆ दारु कोठार पाहून पुन्हा मुख्य पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिर आहे. हे मंदिर त्रिदल प्रकारातले असून त्याला एक मुख्य गर्भगृह व उजव्या आणि डाव्या बाजूला दोन छोटी गर्भगृहे आहेत.
◆ रामेश्वर मंदिरा जवळ एक वीटांनी बांधलेला ६ फ़ूटी पोकळ मनोरा आहे.अशाप्रकारचे दोन मनोरे किल्ल्यात आहेत.
◆ दुसरा मनोरा ओलांडून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या मधोमध एक ३० फ़ूट उंच बुरुजासारखी रचना दिसते. त्यावर जाण्यासाठी मातीचा उतार बनवलेला आहे. हा बुरुज नसून हत्ती मोट आहे.
◆ या मोटे खाली एक हौद आहे. वरच्या टोकाला भिंतीत दोन मोठी भोके असलेले दगद बसवलेले आहेत. या भोकातून लाकडाचा भक्कम वासा टाकून त्यावर कप्पी बसवून हत्ती / घोडे/ बैलाच्या सहाय्याने पाणी वर खेचून घेतले जात असे. या हौदापर्यंत पाणी आणण्यासाठी नदी जवळ अशाप्रकारची दुसरी ५० फ़ूट उंचीची मोट बांधलेली पाहायला मिळते.
◆ या दोन मोटा पाहून पुढे गेल्यावर लक्ष्मी नारायण मंदिर आहे. हे मंदिर अप्रतिम आहे.
◆ लक्ष्मी नारायण मंदिरासमोर बालेश्वर मंदिर आहे.
◆ बालेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यावर पाताळेश्वर मंदिर आहे. या मंदिराचे सर्व अवशेष नष्ट झालेले आहेत.
◆ पाताळेश्वर मंदिराच्या पुढे गेल्यावर एक ६ फुटी चौकोनी प्रवेशद्वार दिसते याला पाण दरवाजा या नावाने ओळखतात.
◆ या दरवाजाच्या बाजूला दोन बुरुज आहेत. या ठिकाणी दोन तटबंद्या आहेत. एक नदी जवळची आणि दुसरी दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी बांधलेली. या दरवाजातून नदीवर जाता येत असे.
◆ पाण दरवाजा पाहून आल्या मार्गाने परत येउन नदीचा बाजूला एक मोठे टेकाड दिसते. टेकाडाला वळसा घालून पुढे गेल्यावर दक्षिणाभिमुख प्रवेशद्वार आहे.
◆ प्रवेशव्दाराला लागून मशीद आहे. प्रवेशद्वातून आत शिरल्यावर आत्ता तयार केलेली सुंदर बाग दिसते. या भागाला सदर किंवा दिवाणे आम म्हणतात.
◆ छ. संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद करुन १५ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी या गडावर आणण्यात आले होते. त्याठिकाणी आता असलेल्या कोरीव खांबाला शौर्य स्तंभ म्हणून पुजले जाते.
◆ प्रवेशव्दारा समोर एक इमारत आहे. ही हमामखान्याची इमारत आहे.
◆ या इमारतीत कलाकुसर केलेले वेगवेगळ्या आकाराचे हौद आहेत. इमारतीत प्रकाश येण्यासाठी छतावरील घुमटात झरोके ठेवलेले आहेत. छतावर जाण्यासाठी जीना आहे छतावर एक हौद आहे.
◆ हमामखान्या शेजारी एक उध्वस्त इमारत आहे . त्याच्या राहीलेल्या अवशेषांवरुन तो महाल असावा असे म्हटले जाते.
◆ पुढे एक भवानी मंदिर आहे. या मंदिरा भोवती चार बुरुज आणि तटबंदी आहे. हे भवानी मंदिर पाहून परत किल्ल्यात येउन पुढे चालत गेल्यावर अजून एक प्रवेशव्दार आहे.
◆ पूर्वेकडील दोन्ही प्रवेशव्दारे पाहून मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.

कसे जाल ? 🚶🏻

१) बहादूरगड उर्फ पेडगावचा किल्ला पाहाण्यासा्ठी जवळचे मोठे गाव दौंड आहे. एसटी स्थानकातून पेडगावला जाणाऱ्या बसेस मिळतात. पण उत्तम पर्याय म्हणजे दौंडहून खाजगी वहानाने अष्टविनायका पैकी एक असलेले सिध्दटेक आणि सिध्दटेक पासून बहादूरगड ही दोन्ही ठिकाणे एका दिवसात पाहावीत .
२) दौंडवरुन अजनूज मार्गे थेट बहादूरगड उर्फ पेडगावला जाता येते.

  • राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
  • पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी नाही.

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search